आर्याभारताच्या वनपर्वाच्या अंतर्गत - नलपर्व​

 आर्याभारतांतर्गत वनपर्वातील​ ४था अध्याय​

नलोपाख्यानपर्व​

श्रीवीरसेनसुत नळ निषधेश्वर सुगुणमणिकरंडक हो ।
ब्रह्मण्यप्रभु दुर्गतदारिद्र्यसमुद्रवरतरंडक हो ॥१॥

वीरसेनाचा मुलगा "नल​", निषध देशाचा अधिपति, उत्तमगुणरूपी मण्यांनी भरलेला करंडा (दागिने ठेवण्याचा पेटारा) होता. तो ब्रह्मण्य म्ह​. ब्राह्मणांचे हित चिंतणारा किंवा ब्राह्मणांना आश्रय देणारा, तसेच​ भाग्यवश (दुर्गतिने) दरिद्रतारूपी समुद्रामध्ये बुडत असलेल्यांसाठी उत्तम नौकाच (तरंडक) होता. अर्थात् तो अतिशय दानशूर होता.

तो पुण्यश्लोक रणी करिता रिपुवीरहानि वासवसा ।
तत्कीर्ति म्हणे, "गी-श्री-धी हो! या, योग्य हा निवास, वसा." ॥२॥

तो पुण्यश्लोक (पावन कीर्ति असलेला) नळ राजा​ युद्धामध्ये इंद्राप्रमाणे (वासव म्ह​. इंद्र​) शत्रूंच्या वीरांची हानि करीत असे. त्याची कीर्ति, "हे वाणि! हे लक्ष्मि! हे बुद्धे! तुम्ही सर्व जणी या नळाच्या ठिकाणी रहायाला या. हा तुमचा निवास म्हणून​ योग्य आहे." से म्हणत असे. अर्थात् त्याच्या शुद्ध आचार - धार्मिक्य - दातृत्व ​- तितिक्षादि गुणांमुळे त्याची कीर्ति सर्वत्र पसरली, आणि त्या पावन कीर्तिनेच त्याच्याजवळ वाक्पटुत्व​, धन आणि सुबुद्धि  हेही आले.


Comments

Popular posts from this blog

कृष्णविजय - अध्याय पंधरावा - भगवंतांनी केलेली बलरामस्तुति (English Translation)

मोरोपंत - केकावली